मुंबई : न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा अंदाज असल्याने न्यूझीलंडने बरोबर डाव टाकला होता. पहिल्या दिवशी न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 235 धावांवर बाद झाला. त्यामुळे टीम हा सामना जिंकेल अशा आशा वाढल्या होत्या. पहिल्या डावात मोठ्या आघाडीची अपेक्षा टीम इंडियाकडून होती. पण गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला कित्ता पुन्हा एकदा गिरवला गेला. भारताने पहिल्या डावात 263 धावा केल्या आणि 28 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे भारताची दुसऱ्या डावात काही खरं नाही हे स्पष्ट होतं. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 174 धावा केल्या. यातून 28 धावा वगळता 146 धावांचं सोपं आव्हान देण्यात आलं होतं. पण टीम इंडियाची फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींनी डोक्यावर हात मारून घेतला. विजयासाठी दिलेल्या 146 धावाही भारताला करता आल्या नाही. भारताचा संपूर्ण डाव 121 धावांवर आटोपला आणि 25 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.