सावधान! – मान्सूनचा जोर वाढणार, मुंबईला यलो, कोकणाला ऑरेंज अलर्ट ! ; रत्नागिरी, सिंधुदुर्गातील अंदाज काय?

मुंबई : गेल्या आठवड्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सध्या दडी मारली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. आता मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनने आता पुन्हा एकदा जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. या काळात मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट जारी –

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर दक्षिण कोकणात विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा बसणार –

मे महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर जूनच्या सुरुवातीला पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील काही दिवस महाराष्ट्रात दमदार मान्सून –

या सर्व जिल्ह्यांतील नागरिकांना आणि विशेषतः मच्छीमारांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नद्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. अचानक येणाऱ्या जोरदार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. एकूणच पुढील काही दिवस महाराष्ट्रात दमदार मान्सून होईल, असा अंदाज आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles