बांदा : शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करताना सीआरए तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. यासाठी दाखविण्यात आलेल्या सीआरए तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाप्रमाणे लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून पाडलोस येथील कृषी तंत्र विद्यालय येथे जिल्हा परिषद कृषी विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच ग्रामपंचायत पाडलोस यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. जाधव बोलत होते. व्यासपीठावर पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र पाटील, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ गोरे, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक शैलेश परब, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. यशवंत गोवेकर, मृदा शास्त्रज्ञ डॉ.मोरे, कृषी तंत्र विद्यालयाच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विलास गवस, सावंतवाडी पंचायत समिती कृषी अधिकारी शुभदा कविटकर, पाडलोस ग्रामसेवक प्रतिभा आळवे, उपसरपंच राजू शेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गावातील तिन्ही प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी कृषी दिंडी काढली. उपस्थित शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे सीआरए तंत्रज्ञान प्रात्यक्षिकासह बांदा मंडळ कृषी अधिकारी युवराज भुईम्बर व त्यांचे सहकारी यांनी करून दाखविले. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी इशस्तवन व स्वागत गीत सादर केले.
श्रीमती कविटकर यांनी प्रास्ताविकात स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृतींना उजाळा दिला. हरितक्रांती विषयक त्यांच्या कार्याची आठवण केली. तालुका कृषी अधिकारी श्री. गोरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविले.
वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ. मोरे यांनी भात पीक एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. भात पिका करिता सिलिकॉन या अन्नघटकाच्या आवश्यकतेबाबत त्यांनी माहिती दिली. वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. यशवंत गोवेकर यांनी भात पीक कीड व रोगांबाबत मार्गदर्शन केले. उपकृषी अधिकारी श्री. सरगुरु यांनी कृषी विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र पाटील यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. जाधव यांनी शेतीची कास धरून आपला सर्वांगीण विकास साधणे बाबत आवाहन केले. पंचायत समिती कृषी अधिकारी शुभदा कविटकर यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पाडलोस कृषी तंत्र विद्यालय यांचेमार्फत उपस्थित शेतकऱ्यांना सुपारी रोपांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पाडलोस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक प्रतिभा आळवे, ग्रामपंचायत कर्मचारी, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. ननवरे व पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी एकनाथ सावंत व श्री. शेळके तसेच कृषी तंत्र विद्यालय पाडलोसचे सर्व शिक्षक वृंद, प्राथमिक शाळा पाडलोस शिक्षक वृंद, कृषी सखी, शाळा समिती यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हास्तरीय भात पीक स्पर्धेत नेमळेतील शेतकरी प्रथम
जिल्हास्तरीय भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या नेमळे येथील शेतकरी लक्ष्मण परब, तालुकास्तरावर भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारे मळेवाड येथील शेतकरी नारायण मधुसूदन मुळीक, द्वितीय क्रमांक निरवडे येथील भरत नारायण माणगावकर, तृतीय क्रमांक पटकावणारे धाकोरे येथील बाळकृष्ण लक्ष्मण हळदणकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सत्कार कर्तव्याचा…
शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना आदर्श पत्रकार पुरस्कार मिळवणारे पत्रकार तथा पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन विश्वनाथ नाईक तसेच पत्रकार प्रवीण परब यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सहाय्यक कृषी अधिकारी श्री ननवरे तसेच बायोगॅस व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक यांचाही सत्कार करण्यात आला.
———

फोटो – पाडलोस : जिल्हास्तरीय भात पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या नेमळे येथील शेतकऱ्याचा सन्मान करताना अधिकारी.


