सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रिडाधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी जिल्हास्तरावर निवड करण्यासाठी तालुक्यांमध्ये शालेय कॅरम व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुक्ताई ॲकेडेमीत प्रशिक्षण घेत असलेल्या सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला आणि मालवण या तालुक्यांमध्ये तब्बल चोवीस विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
त्यापैकी सोळा विदद्यार्थी आणि विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय कॅरम व बुदधिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ॲकेडेमीच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर वर्चस्व ठेवले. साक्षी रामदुरकर, गार्गी सावंत, भूमी कामत, सई परुळेकर, माहिरा खुल्ली, आस्था लोंढे, चिदानंद रेडकर, पार्थ गावकर, अथर्व वेंगुर्लेकर, वसंत गवस, प्रबोध जाधव, सोनल मराठे, अर्श पोटफोडे, प्रज्योत पुराणिक, आदी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी यश संपादन केले.
मुक्ताई ॲकेडेमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचावेत, असा आपला प्रयत्न असल्याचे सांगितले. गेल्या दहा वर्षात कॅरम व बुद्धिबळ खेळात मुक्ताई ॲकेडेमीच्या तब्बल अठरा विद्यार्थी, विद्यार्थिनींची राज्य स्तरावर आणि तीन विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर राज्य व राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची निवड होणारी कोकणातील ही एकमेव ॲकेडेमी आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे देखील पेडणेकर सर म्हणाले. सर्व विद्यार्थ्यांना कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर आणि बाळकृष्ण पेडणेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


