सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलाव परिसरात नागरिक, महिला, बालके तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. मात्र तलाव परिसरात आवश्यक सुरक्षाव्यवस्था नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची बाब पुढे आली आहे. याबाबत स्वीकृत नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी नगरपालिकेकडे निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सदर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सायंकाळच्या वेळी तलाव परिसरात मोठी गर्दी होत असून अनेक बालके तलावाच्या काठावर खेळताना दिसतात. काही वेळा पर्यटक व तरुण मंडळी तलावात पोहण्याचा किंवा पाण्यात उतरण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वीही तलावात बुडण्याच्या घटना घडून जीवितहानी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तलाव परिसरात मजबूत रेलिंग, संरक्षणात्मक जाळी, सूचना फलक तसेच आवश्यक तेथे प्रकाशव्यवस्था व सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तलाव परिसर पर्यटनदृष्ट्या अधिक आकर्षक करण्यासाठी सुशोभीकरणाचे नियोजन करावे, जेणेकरून नागरिकांना सुरक्षित वातावरणात आनंद घेता येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
नगरपालिकेने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



