वैभववाडी : शिक्षण, साहित्य आणि संस्कार यांचा सुंदर संगम असलेले व्यक्तिमत्त्व, विद्यार्थ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे शिक्षक, मालवणी बोलीचे संवेदनशील कवी आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव गवळी सर यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच डॉ. गवळी सर हे संस्थेच्या जडणघडणीचे एक महत्त्वाचे शिल्पकार होते. विद्यार्थ्यांप्रती असलेले अपार प्रेम, सहकाऱ्यांशी जपलेला जिव्हाळा आणि ज्ञानदानाची अखंड तळमळ यामुळे त्यांनी सर्वांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते.
मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर संस्कार, संवेदनशीलता आणि साहित्याची गोडी दिली. त्यांच्या शब्दांत माणुसकीचा ओलावा होता आणि त्यांच्या कवितांमध्ये मातीतल्या भावनांचा सुगंध दरवळत होता.
मालवणी बोलीभाषेतील त्यांच्या लेखनाने साहित्यविश्वात स्वतंत्र ओळख निर्माण केली. विशेषतः ‘भातालय’ या काव्यसंग्रहाने त्यांना राज्यभरात मान्यता आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवून दिले. त्यांच्या कवितांमधून कोकणची माती, माणसं आणि संस्कृती जिवंत होत असे.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्रभारी प्राचार्य अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत कुशलतेने आणि निष्ठेने सांभाळल्या. प्रशासनातील शिस्त, विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता आणि सहकाऱ्यांशी असलेला स्नेह यामुळे ते सर्वांचेच लाडके होते.
आज त्यांच्या जाण्याने केवळ एक प्राध्यापक हरपलेला नाही, तर विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक, साहित्यविश्वाचा संवेदनशील कवी, सहकाऱ्यांचा स्नेही आणि समाजातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
त्यांच्या पवित्र स्मृतीस संस्था, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“शब्दांचे शिल्पकार निघून गेले… पण त्यांच्या कवितांचा सुगंध, विचारांचा प्रकाश आणि विद्यार्थ्यांच्या मनात रुजवलेले संस्कार कायम जिवंत राहतील.”
💐 सरांना भावपूर्ण श्रद्धांजली…! 💐


