बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये गुरुवारी भीषण दुर्घटना घडली आहे. कोळसाखाणीत मोठा भाग कोसळल्याची माहिती हाती आली आहे. या दुर्घटनेत कमीत कमी 32 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तर या दुर्घटनेत एक डझनहून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर प्रशासनाकडून दुर्घटनेनंतर बेपत्ता झालेल्या लोकांचाही शोध सुरू आहे. बलुचिस्तानची राजधानी क्वेटाजवळील सुरांजच्या दुर्गम भागात हा भीषण स्फोट झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बलुचिस्तानचे खाण आणि खनिज विकास मंत्री शोएब नौशेरवानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, ‘खाणीत स्फोट झाला, त्यावेळी विविध भागात मजूर काम करत होते’.
नौशेरवानी यांनी दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. तसेच घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख पाकिस्तानी रुपयांची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिले आहेत. खाणीच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखण्याचेही आदेश दिले आहेत. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचलं आहे. खाण विभागाचे मुख्य निरीक्षक मोहम्मद आतिफ यांनी सांगितलं की, खाणीत सुमारे 4000 फूट खोलीवर बचावकार्य सुरू आहे. खाण कामगारांच्या युनियनने या घटनेनंतर आक्रमक भूमिका घेतली आहे.



