मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे सध्या फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चेत आहेत. आयुक्तपद स्वीकारल्यानंतर अन्नपदार्थांत भेसळ करणारे, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणारे यांच्याविरोधात मुंढे यांनी मोठी मोहीम राबवली आहे. त्यांच्या आदेशानंतर आतापर्यंत अनेक उपहारगृहे, हॉटेल आणि रेस्टॉरंट्सचे परवाने रद्द किंवा निलंबित करण्यात आहेत. त्यांच्या या कारवाईचे सामान्यांकडून स्वागत केले जातेय. दरम्यान, आता याच तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर नुकतेच एक ट्वीट केले आहे. त्यांनी अवघ्या तीन ओळींचे ट्वीट केले आहे. पण त्यांच्या या ट्वीटची सगळीकडेच चर्चा होत आहे. त्यांचे ट्वीट वाचून अनकेजण त्यांचे कौतुक करत आहेत.
तुकाराम मुंढे आपल्या तत्त्वांवर ठाम –
तुकाराम मुंढे हे कर्तव्यकठोर अधिकारी मानले जातात. नियमानुसार काम करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कठोर कारवाई होणार, असा त्यांच्या कामाचा नियम आहे. त्यांच्या या नियमामुळे अनेकदा त्यांच्यावर टीका झाली. त्यांना आतापर्यंत अनेकदा बदलीच्या आदेशांना सामोरे जावे लागले. परंतु याची तमा न बाळगता मुंढे यांनी कायम आपल्या तत्त्त्वांवर श्रद्धा ठेवली. त्यांनी आपल्या तीन ओळींच्या ट्वीटमध्ये पुन्हा एकदा मी माझ्या तत्त्वांवर ठाम असल्याचेच सांगितले आहे.
तुकाराम मुंढे यांच्या ट्वीटमध्ये नेमके काय आहे?
तुकाराम मुंढे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये एका वृत्तपत्राचे वृत्त दिसत आहे. हे इंग्रजी भाषेतील वृत्त आहे. त्या वृत्तात तुकाराम मुंढे यांच्या कामाची पद्धत तसेच 20 वर्षांत 21 वेळा बदली झाली, असा उल्लेख करण्यात आलाय.
याच वृत्ताचा आधार घेत जे योग्य आहे, त्याच्याच बाजूने उभे राहा. जेव्हा योग्य गोष्ट करणे सोप नसते, तेव्हाच नेतृत्त्वाचा कस लगातो. पदं बदलतात, परिस्थितीही बदलते पण तत्त्वे मात्र अढळ राहिली पाहिजेत, असं तुकाराम मुंढे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्याच्या याच ट्वीटची सगळीकडे सध्या चर्चा आहे.



