सावंतवाडी : मुसळधार पावसामुळे पाळणे कोंड धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, सावंतवाडीकरांच्या पाणीटंचाईच्या प्रश्नाला मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. वाढत्या जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी आज धरणाला सदिच्छा भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करून धरणात नारळ अर्पण करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने पाळणे कोंड धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सावंतवाडी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ही परिस्थिती समाधानकारक मानली जात आहे. धरणातील वाढता जलसाठा पाहून भविष्यात शहराची पाण्याची गरज भागण्यास मोठी मदत होणार असल्याचे चित्र आहे.
नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांसह धरण परिसराची पाहणी करून पाणीपातळी, उपलब्ध जलसाठा तसेच पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी परिसराची पाहणी करताना पावसामुळे वाढलेल्या जलसाठ्याची माहितीही अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.
‘धरण भरलं, तर सावंतवाडीकरांची चिंता मिटणार!’ या भावनेतून जलपूजन करत परिसराच्या समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात होत असलेली वाढ शहरवासीयांसाठी निश्चितच दिलासादायक ठरत आहे.
यावेळी नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, सिद्धार्थ भांबुरे, अधिकारी प्राजक्ता कांबळे यांच्यासह नगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



