वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात “मराठी भाषा गौरव दिन” कार्यक्रम प्रभारी प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एन.व्ही गवळी, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे व मराठी विभागाच्या प्रा. संजीवनी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयातील स्पंदन विभागाच्या वतीने कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याचे भित्तीपत्रक प्रदर्शन करण्यात आले होते.
कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दि.२७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेमध्ये जे साहित्यिक योगदान दिलेले आहे ते अनमोल असेच आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते तसेच त्यांच्या साहित्याला ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविलेले आहे. आज मराठीला अभिजातपणाचा दर्जा मिळाला आहे असे प्रास्ताविकात प्रा.संजीवनी पाटील यांनी सांगितले. यावेळी
कु. श्रुती खाडे, कु.श्रेणी पाटणकर व कु.अनुराग शेट्ये यांनी मनोगते व्यक्त केली. आपल्या मराठी भाषेचा प्रत्येकाला सार्थ अभिमान असला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर सर्वांनी केला पाहिजे असे श्री.संजय रावराणे यांनी सांगितले. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी त्या भाषेला प्रमाणित पुरावे असावे लागतात. मराठी भाषा ही नवव्या शतकापासून वापरात असून या भाषेला समृद्ध करण्याचे काम अनेक संत, कवी, लेखक व साहित्यिकांनी केले आहे. भाषा फक्त पुस्तकात असून चालत नाही ती बोलावी लागते तरच ती टिकून राहते.
अशा या मराठीमध्ये साहित्य प्रकार, कलाप्रकार यांची समृद्ध परंपरा आहे आणि ती दिवसेंदिवस अधिकाधिक समृद्ध होताना दिसते आहे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगताना हे समृद्ध परंपरा आपण जोपासायला हवी असे अध्यक्षीय भाषणात डॉ. एन.व्ही.गवळी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.संजीवनी पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाने केले होते.