आडाळी एमआयडीसीत ५०० उद्योग आणणार : १ लाख रोजगार देण्याचा प्रयत्न.
इको सेन्सिटिव्ह भागात विकासाची सांगड घालू.!
सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्गाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आहे. जनतेचे प्रश्न सोडवून समाधानकारक निर्णय घेण्यात येतील. मात्र, केवळ विरोधाला विरोध करून विकासात आडवे येणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा खासदार नारायण राणेंनी दिला.
दरम्यान, आडाळी एमआयडीसीत ५०० प्रकल्प आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. १ लाख रोजगार निर्माण करायचे आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणेंनी पुढचं पाऊल टाकलं आहे. आमदार दीपक केसरकर तसेच आमदार निलेश राणे व आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत असल्यानं जिल्ह्याच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असा विश्वास खा. राणे यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, माजी जिल्हा परिषद सभापती प्रमोद कामत, गुरूनाथ पेडणेकर,
शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, राजू बेग, उदय नाईक, महेश धुरी, मोहीनी मडगावकर, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, मनोज नाईक, चंद्रकांत जाधव, गुरु मठकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ते म्हणाले, आडाळी एमआयडीसीत प्रकल्प आणण्यासाठी माझी जिंदाल, अदानी ग्रुपसह अन्य काही उद्योग समूहांशी चर्चा झाली आहे. तिथे ५०० कारखाने उभारणारा उद्योजक हवा आहे. त्यासाठी जमिन उपलब्ध आहे. या एमआयडीसीच्या माध्यमातून मला किमान १ लाख रोजगार निर्माण करायचे आहेत. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू असून त्यात निश्चितच यश येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तरी काही फरक पडत नाही. ते महाराष्ट्राला काय देणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले ? त्यांनी सिंधुदुर्गला काय दिलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, इको सेन्सिटिव्ह भागात कसा विकास करायचा याची सांगड मी घालेन. ज्यांनी आपले संसार मायनिंगवर चालवले तेच आज तक्रारी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधाला आम्ही जुमानत नाही. वेळ पडली तर त्यांना कोणी किती पैसे दिले ते जाहीर करावे लागेल. कोणतेही व्यवसाय नसताना उत्पन्न आलं कुठून ? एकानं आमदार असताना कोल्हापूर येथील ठेकेदाराकरवी काम घेतलीत. ही काम निकृष्ट झालीत. त्यांना सोडणार नाही, केसेस दाखल करणार असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
‘एआय’ प्रणालीमुळे जिल्ह्याचा गतिमान विकास : खा. नारायण राणे
‘एआय’ प्रणाली वापर करणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा आहे. या दृष्टीने पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढचं पाऊल टाकलं आहे. पालकमंत्री नितेश राणे, मी खासदार, निलेश आमदार व दीपक केसरकर मार्गदर्शक आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा विकास अधिक गतिमान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.