सावंतवाडी : गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नेमळे कामळेवीर परिसरातील विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे वीज ग्राहकाचे मोठे नुकसान झाले आहे. अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे नेमळे गावात वारंवार विद्युत प्रवाह खंडित होत आहे, असा आरोप नेमळे ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीवर केला आहे. चार दिवस वीज खंडित असल्यामुळे नेमळे ग्रामस्थ फोन करून विचारणा करतात म्हणून संबधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपापले फोन बंद करून ठेवले आहेत. एका महिन्याची वीज बिले जर वेळेत नाही भरली तर शेजाऱ्याकडून पैसे घ्या आणि वीज भरा अशा प्रकारची भाषा अधिकाऱ्याकडून ग्राहकांना ऐकवली जाते. मात्र आमच्या गावाला दुसरीकडून लाईट जोडून द्या तर तस आम्हाला करता येत नाही, अशी उत्तरे अधिकारी नेमळे गावात येऊन ग्राहकांना ऐकवतात. यामुळे नेमळे सरपंच, उपसरपंच संतप्त ग्रामस्थांनी वेंगुर्ले येथील ऑफिसवर मोर्चा घेऊन जाण्याचे ठरविले आहे.



