सर्वात मोठी बातमी! – ठाकरे गटाचे सर्वच नेते राज्यपालांना भेटणार ! ; अचानक निर्णय, काय घडतंय?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून एक मोठी मागणी केली जाणार आहे. यामुळे महायुती सरकारला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही नेते आज सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान राजभवनात  जाणार आहेत. यावेळी ते राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांकडून महायुतीतील कलंकित मंत्र्‍यांचे राजीनामे घेण्याची मागणी केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसात सत्ताधारी मंत्र्यांचे जे अत्यंत बेजबाबदार वर्तन सुरू आहे . यामुळे विधिमंडळाच्या पावित्र्याला धक्का लागत आहे. तसेच जनमानसातील विधिमंडळ कामकाजासंदर्भातल्या विश्वासाला सुद्धा धक्का लागत आहे. सबब अशा बेजबाबदार मंत्र्यांना तातडीने सत्तेतून पायउतार करावे. यासाठी आज सकाळी 11:20 वाजता शिवसेना UBT चे सर्व नेते, लोकप्रतिनिधी महामहीम राज्यपाल महोदयांची राजभवन येथे भेट घेऊन अशा वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामा घेण्याबाबत निवेदन देत आहोत, अशी माहिती ठाकरे गटाने दिली आहे.

सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया –

नुकतंच याबद्दल शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राज्यपालांची भेट घेण्यासाठी जात आहेत. सध्याच्या मंत्र्यांच्या वागणुकीमुळे लोकशाहीला धक्का लागत आहे आणि त्यांचे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणे सुरू आहे. या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठीच आज राज्यपाल भेटीला जात असल्याचे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.

यावेळी सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केले. “आमच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. दुधात साखर पडावी त्याप्रमाणे हे घडले आहे. दोन भावांनी एकत्र येणे महत्त्वाचे होते. तसेच दोन मने जुळणे हे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा कुटुंब एकत्र येते, तेव्हा असे घडते. देवेंद्र फडणवीस यांचे नाव यापूर्वीच खराब झाले आहे. त्यांनी या भेटीवर सावध प्रतिक्रिया दिली, हेच त्यांचा अलर्टपणा दर्शवते”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

कोणत्या गटातील किती मंत्री?

दरम्यान शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नारळ दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असल्याचे बोललं जात आहे. तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख प्रकरणामुळे आधीच राजीनामा झाला आहे. त्यापाठोपाठ आता सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. तसेच, नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन केले जात आहे. त्यामुळे त्यांचेही मंत्रिपद धोक्यात आले आहे.

गिरीश महाजन यांनाही पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. या फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी भाजपमध्ये सध्या नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या संभाव्य फेरबदलांमुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles