सावंतवाडी : ज्या माणसाला सर्वसामान्य माणसं भेटायला आल्यानंतरही वेळ मिळायचा नाही, ‘माझं फ्लाईट चुकतंय, मला जायचं आहे’, अशी कारणे देऊन निघून जाणारे, कोणालाही सहज न भेटणारे दीपक केसरकर हे आज बैठकांच्यावरती बैठका घेत आहेत. ही सगळी नाटकं लोक ओळखून आहेत. ही सर्व नाटक बंद बंद करा. जे केसरकर कोणत्याही गावात एक तास गेल्या पंधरा वर्षांमध्ये थांबू शकलेले नाहीत. सर्वसामान्य नागरिकांना दुर्लक्षित केले गेले. त्या नागरिकांना तुच्छ मानलं गेलं. ‘मी पैसे देऊन निवडून येतो,’ असा ज्यांना माज आहे. आता हा माज उतरवला गेला पाहिजे .आता शेवटच्या महिन्यात बैठका घेत आहेत. केसरकर पंधरा वर्षे काय झोपले होते?, व्यापारी संकुलातील भाडे आकारणी निर्णयाची बैठक हा निवडणुकीचा एक भागच आहे. पुढच्या वीस वर्षांतही सावंतवाडी शहरातील व्यापारी कॉम्प्लेक्स उभे राहू शकणार नाही, असा खोचक टोला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी लगावला आहे.



