दोडामार्ग: आमच्यावर दोडामार्ग तालुक्यातील विरोधकांनी टीका जरूर करावी, मात्र त्यांनी हे विसरू नये की ते देखील एका काळात सत्तेवर होते. हत्ती हा प्रश्न काही आजचा नाही. सन 2002 पासून दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा वावर सुरू आहे. आजपर्यंत प्रत्येक सरकारने या समस्येवर निरनिराळे प्रयत्न केले, मात्र अपेक्षित यश कोणालाही मिळालेले नाही त्यामुळे आम्हालाच यामध्ये दोषी पकडून टार्गेट करू नये आमचाही हत्ती मुक्त दोडामार्ग तालुका व्हावा यासाठी शंभर टक्के प्रयत्न सुरू आहेत. आणि आम्ही केव्हाही आमच्या जबाबदारीतूज पळ काढणार नाही अशी परखड भूमिका विरोधी पक्षांकडून शिवसेना (शिंदे गट) यांच्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस मांडली आहे.
श्री. गवस पुढे म्हणाले की, अलीकडे ओंकार हत्ती पकड मोहिमेसंदर्भात न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की, हत्तीला पकडण्यास नकार देत त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. मात्र हत्तीप्रेमींकडून दोडामार्ग तालुक्यातच हा भाग हत्तींचा अधिवास असल्याचे सांगितले जात आहे. याला आमचा ठाम विरोध आहे. जर आपण आज शांत बसलो, तर उद्या ‘हत्ती दोडामार्गचेच आहेत’ असा मुद्दा उपस्थित करून केवळ नुकसान भरपाई देण्याचे आमिष दाखवले जाईल आणि हा प्रश्न कायमस्वरूपी आपल्या माथी मारला जाईल. हे धोका ओळखून पक्षीय मतभेद विसरून दोडामार्ग तालुक्यातील सर्व लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे असे गवस यांनी स्पष्ट केले.
टीका करण्यासाठी अजून खूप मुद्दे आहेत..
एकमेकांवर टीका करण्यासाठी आपल्या सर्वांकडे खूप वेळ आहे, मात्र सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तालुक्याचे भवितव्य आणि नागरिकांची सुरक्षितता. हत्तींच्या उपस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य ग्रामस्थ त्रस्त आहेत. तसेच आमच्या सरकारकडूनही या प्रश्नावर अपेक्षित यश मिळालेले नाही, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. मात्र आम्ही या जबाबदारीतून कधीही पळ काढलेला नाही आणि काढणारही नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन लढा द्यावा लागेल, असेही श्री. गवस म्हणालेत.



