सावंतवाडी : श्री सिद्धीगिरी संस्था मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत कणेरी मठ येथे ‘सिद्धीगिरी कारागीर महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे व्यवस्थापन एकत्वम इन्फ्रा, पुणे यांच्यामार्फत करण्यात येत असून, पारंपरिक कला व हस्तकलेचा हा एक भव्य उत्सव ठरणार आहे.
या महोत्सवामध्ये विविध राज्यांतील कुशल कारागीर आपल्या पारंपरिक कलेचे सादरीकरण करणार आहेत. बदलत्या काळानुसार कलेत झालेले आधुनिक बदल आणि त्यातून निर्माण झालेल्या नव्या संधींचा अनुभवही येथे घेता येणार आहे. राज्य व देशभरातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेला बाजारपेठ मिळावी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महोत्सवात टेराकोटा, मातीची भांडी, बॅम्बू वर्क, लाकडी वस्तू, पेंटिंग, पिंपळी चित्रकला, आदिवासी चित्रकला, स्टोन वर्क, धातूशिल्प, वारली चित्रकला, तसेच पारंपरिक साड्या, बंजारा कला, बनारसी वस्त्रप्रकार अशा विविध कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.
तसेच अभियांत्रिकी, आयटीआय, पॉलिटेक्निक व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठीही हा महोत्सव खुला ठेवण्यात आला आहे. पारंपरिक कलेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड कशी घालता येईल, याचा अभ्यास करण्याची संधी युवकांना मिळणार आहे.
कोल्हापूरसह महाराष्ट्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘सिद्धीगिरी कारागीर महोत्सव’ हा कला, संस्कृती आणि परंपरेचा संगम ठरणार असून, कारागिरांच्या सन्मानासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.



