✍️ रुपेश पाटील
सावंतवाडी : तळकोकणच्या लाल मातीच्या सुगंधात वाढलेली, संघर्षाला कवटाळत स्वप्नांना पंख देणारी महेंद्रा अकॅडेमीची विद्यार्थिनी दया पालव हिने आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात मानाचे स्थान पटकावत ठाणे ग्रामीण पोलिसपदी निवड मिळवली आहे. तिच्या या उज्ज्वल यशाने केवळ तिच्या कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण परिसराचा उर अभिमानाने भरून आला असून आनंदाचे एक साजरे वातावरण सर्वत्र निर्माण झाले आहे.
शेतकरी कुटुंबातील साध्या घरातून आलेली दया, अनेक अडचणींना सामोरी जात, अपार मेहनतीच्या जोरावर उभी राहिली. तिच्या डोळ्यांतले स्वप्न आणि मनातील जिद्द यांची सांगड घालत तिने स्पर्धा परीक्षेच्या कठीण वाटेवर ठाम पावले टाकली. योग्य मार्गदर्शन, प्रामाणिक प्रयत्न आणि अविरत संघर्ष यांच्या बळावर तिने हे यश संपादन करत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली.
तिच्या या यशाने महेंद्र अकॅडेमीचे शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिक यांच्याकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शेतकरी कुटुंबातील मुलीने गाठलेले हे यश अनेक तरुणांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे, प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारे ठरत आहे.
दया पालव हिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या यशाचा सुवर्ण क्षण प्रत्येकाच्या मनात साठवला जात आहे. महेंद्रा अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत, “तुझी ही भरारी अनेकांना उंच झेप घेण्याची प्रेरणा देईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.



