महायुतीत मिठाचा खडा! ; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून किती जागांची मागणी?, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड कोणासाठी?

मुंबई : राज्यातील कोरोना संकट आणि ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने या १६ जागांसह नागपूरच्या एका जागेसाठी अशा एकूण १७ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. येत्या १८ जून रोजी यासाठी मतदान होणार आहे. तर २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक जाहीर होताच सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले असले, तरी जागांच्या दाव्यांमुळे अंतर्गत तिढा निर्माण झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. या नव्या लोकप्रतिनिधींच्या संख्याबळाच्या जोरावर भाजप महायुतीत आपले वर्चस्व कायम ठेवू पाहत आहे.

कुठे कोणाची ताकद?

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असल्याने भाजप १७ पैकी १२ जागा स्वतः लढवण्यावर ठाम आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाणे, नाशिक आणि संभाजीनगरसह ७ जागांवर आपला हक्क सांगितला आहे. विशेषतः ठाणे आणि नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असल्याने येथे ताकद पणाला लावली आहे. तसेच पूर्वी जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती, तेव्हा १७ पैकी पुणे, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड या ३ जागांवर त्यांचे आमदार होते. त्यामुळे अजित पवार गटाने या ३ जागांची मागणी केली आहे. भाजप स्वतः १२ जागा लढवून उर्वरित ५ जागांपैकी ३ जागा शिवसेना शिंदे गट आणि २ जागा राष्ट्रवादी अजित पवार गट देण्याचा प्राथमिक प्रस्ताव आहे. मात्र, या फॉर्म्युल्यामुळे मित्रपक्षांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles