रत्नागिरी : समाजातील वंचित, गरजू आणि होतकरू घटकांना शिक्षण व आरोग्याच्या मूलभूत सुविधांसाठी आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागू नये, यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था अविरत कार्यरत आहे. “गोरगरीबांना शिक्षणासाठी कर्ज घ्यावे लागू नये आणि उपचारांसाठी दागिने गहाण ठेवण्याची वेळ येऊ नये,” हा आपला ध्यास असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी केले. कोकणच्या मातीतून भविष्यात आयएएस, आयपीएससारखे उच्चपदस्थ अधिकारी घडविण्याचे स्वप्नही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
रत्नागिरी येथील श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिजाऊ संस्थेच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की, पालघर, ठाणे आणि रत्नागिरी येथे सुरू असलेल्या मोफत रुग्णालय सेवेमुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळत आहे. तसेच जिजाऊच्या मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रातून अनेक युवक शासकीय सेवेत दाखल होऊन समाजात नवा आदर्श निर्माण करत आहेत.

“समाजाचे काहीतरी देणे लागतो,” या भावनेतून जिजाऊ संस्थेची स्थापना करण्यात आली. आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन आम्ही समाजातील दिनदुबळ्या, उपेक्षित आणि गरजू घटकांसाठी काम करत आहोत. कोकणातील पाचही जिल्ह्यांत संस्था विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवत असून सर्वसामान्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे काम करत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यास माजी केंद्रीय मंत्री Suresh Prabhu, भगवान सांबरे, भावना सांबरे, उद्योजक रवींद्र सामंत, इंद्रजीत देशमुख, उमा प्रभू, धीरज सांबरे, सुदर्शन पाटील, एअर मार्शल Hemant Bhagwat, ॲड. नकुल पार्सेकर, संजय ढवळीकर, सागर चव्हाण, राहुल गडपाले, बाबा टोपले, डॉ. सुशीलकुमार मुळे, राजेंद्र केसरकर, विनोद राऊळ, मोहन होडावडेकर, डॉ. संतोष राणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सेवेचा वसा, समाजाचा श्वास”
शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी यांची त्रिवेणी जपत जिजाऊ संस्था कोकणातील हजारो कुटुंबांसाठी आधारवड ठरत आहे. निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही चळवळ केवळ सेवाकार्य नसून समाजपरिवर्तनाची एक सशक्त मोहीम बनत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



