मुंबई : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांनी अधिकृत संकेतस्थळावरून जीआर हटवले असल्याची माहिती आयोगाने दिली.
निवडणूक आयोगाने राज्य विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर मंगळवारी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंरतही संकेतस्थळावर अनेक आदेश किंवा सरकारी ठराव टाकण्यात आले होते. मंगळवारी साडेतीन वाजल्यानंतर संकेतस्थळावर टाकलेले जीआर हटवण्यात यावे, असे आम्ही विविध विभागांना सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करताच आदर्श आचारसंहिता लागू झाली, त्या वेळेवर हे जीआर संकेतस्थळावर टाकण्यात आले होते, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुळकर्णी यांनी सांगितले.
सदर जीआर केवळ संकेतस्थळावरून हटवण्यात येतील, ते मागे घेतले जाणार नाहीत किंवा रद्द होणार नाहीत. मात्र त्यांची छाननी केली जाईल. ज्या जीआरमुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत नसेल, ते राज्य सरकारच्या संकेतस्थळावर संबंधित विभाग टाकू शकतील, असे कुळकर्णी यांनी सांगितले.