✍️रूपेश पाटील.
कणकवली : जुलै महिना सरत असतानाही पावसाने अचानक दडी मारल्याने सिंधुदुर्गातील भातशेती गंभीर संकटात सापडली आहे. शेतातील हिरवागार बहर ओसरून भाताची रोपे करपू लागली असून जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील वेदना जाणून घेण्यासाठी राज्याचे कर्तव्यदक्ष मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज कणकवली तालुक्यातील तळेरे-वाघाचीवाडी येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी, चिंता आणि नुकसानीची माहिती घेतली. “पाऊस न पडल्याने आमचे संपूर्ण पीक धोक्यात आले आहे,” अशी व्यथा शेतकरी देवीदास चव्हाण आणि अन्य शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली.

यावेळी पालक मंत्री नितेश राणे यांनी संबंधित कृषी व महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे, परिस्थितीचे सर्वेक्षण आणि आवश्यक त्या उपाययोजना सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. “मी स्वतः आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. शासनाच्या निकषांमध्ये बसवून जास्तीत जास्त मदत मिळेल यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील,” अशी ठाम ग्वाही त्यांनी शेतकरी बांधवांना दिली.
या पाहणीवेळी माजी जिल्हा परिषद सभापती रविंद्र (बाळा) जठार, कणकवली मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, माजी सभापती बंड्या मांजरेकर, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपकृषी अधिकारी उमाकांत पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रविण ओहळ, मंडल कृषी अधिकारी अर्जुन जाधव, भात संशोधन केंद्र फोंडाघाटचे डॉ. विजयकुमार शेटये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या पावसाअभावी निर्माण झालेल्या या संकटामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे भविष्य टांगणीला लागले असून, आता सर्वांचे लक्ष शासनाच्या तातडीच्या मदतीकडे लागले आहे.



