सावंतवाडी : ‘भारतीय संविधान’ हे देशातील सर्वधर्म समभाव मानणारे आणि सर्व भारतीयांना संघटित करून विकसित करणारे भारताचे सर्वमान्य धर्मग्रंथ असून प्रत्येक भारतीयांनी संविधानाचे रक्षण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधीज्ञ तथा संविधानाचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आनंद कासले यांनी रविवारी सावंतवाडी येथे केले.
प्रेरणा भूमी संवर्धन समिती, सावंतवाडी आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी ‘भेट वारसा स्मृति प्रबोधन जागर कार्यक्रमात’ प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. कासले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा भूमीचे अध्यक्ष दीपक पडेलकर होते. यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे, गोवा मेडिकल कॉलेजचे प्रा. डॉ. उल्हास चांदेलकर, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी श्री. अंधारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
श्री. कासले यांनी सुरुवातीला देशाच्या जगाच्या विविध क्रांती सांगून भारतातील धम्मक्रांतीचे महत्त्व विशद केले. डॉ. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीपूर्वी भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास सांगून धम्म आणि शिक्षण हे कसं परिवर्तनाला पूरक आहे, हे स्पष्ट केले. सुमारे 95 वर्षांपूर्वी पडेलकर या महान क्रांतिकारकाने सामाजिक असंतोष आणि शोषण विरोधी व्यवस्थेविरुद्ध केलेला उठाव आणि त्या घटनेवर डॉ. बाबासाहेबांनी 1932 मध्ये सावंतवाडी संस्थांच्या न्यायालयात उपस्थित राहून या खटल्याचा केलेला युक्तिवाद त्यांनी सांगून भारतीय राज्यघटनेतील लिखित संविधान, राज्यघटना, संघराज्य, संसदीय लोकशाही आणि समता, न्याय बंधूता या बौद्ध तत्त्वज्ञानाचा भारतीय संविधानात केलेला समावेश, यावेळी सांगून भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेले आर्थिक स्वातंत्र्य, रोजगार आणि त्यातून उच्च शिक्षणाच्या मिळणाऱ्या संधी याचा ओहापोह त्यांनी केला.
देशात सध्या सुरू असलेल्या अनुसूचित जाती, जमातीच्या उपवर्गीय वर्गीकरण, प्रकरणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगर कपारीत पूर्वाश्रमेच्या राहणारा महार आणि आजचा बौद्ध समाज हा अनुसूचित जाती, जमातीची दोन्ही वैशिष्ट्ये कशाप्रकारे धारण करतो?, हे त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत स्पष्ट केले. आंबेडकरी अनुयायाने संविधान टिकवण्यासाठी संविधान समजून घेणे हेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगून संविधानाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीय कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले.
उद्घाटक तथा प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सावंतवाडी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी कुठच्याही कार्यक्रमाचे बजेट महत्त्वाचे नसून कार्यक्रमाचा हेतू महत्त्वाचा असतो, हे सांगून हे विचारांचा वणवा पेटवायला ठीणगीही महत्त्वाची ठरते, हे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रबोधनातूनच विचारांची पेरणी होत असते, हे सांगून डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली सावंतवाडीची ही भूमी अधिक लोकप्रमुख आणि लोकप्रिय होईल, याची सर्वांनी मिळून दक्षता घेतली पाहिजे. तसे आपण काम करूया आणि सावंतवाडीचा लौकिक देशभर होईल याचा प्रयत्न सर्वांनी करूया असे आवाहनही श्री. साळुंखे यांनी केले.
प्रा. डॉ. उल्हास चांदेलकर यांनी जगप्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईनचा बुद्ध तत्त्वज्ञान सांगून शिक्षणाला जेवढं महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व माणसाच्या धम्माला असल्याचे सांगितले. तसेच नागपूर, औरंगाबाद येथील आपल्या समाजाची प्रगती कशी झाली?, हे त्यांनी स्पष्ट केले. परिवर्तन हे केवळ सांगण्यासाठी नसून ते स्वतःपासून आचरणात आणणे आवश्यक असल्याने त्यांनी नमूद केलेसां. तसेच देशाच्या प्रगतीत महिलांचे स्थान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याच्या सामाजिक, धार्मिक प्रगतीत संबोधी ट्रस्टच्या विविध संकल्पनांची माहिती सांगून धम्म आचरण करून तरुणांनी डॉ. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करावे व आपली प्रगती करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना दीपक पडेलकर यांनी आमच्या महापुरुषांची विचारांची ही चळवळ असल्याचे सांगून या चळवळीतूनच परिवर्तनाची एक मोठी चळवळ घडते आहे, असे स्पष्ट केले. ही चळवळ पोटाची खळगी भरणारी चळवळ नसून सन्मान, इज्जत, प्रतिष्ठा व स्वाभिमान मिळवून देणारी चळवळ असल्याचे स्पष्ट केले. तसेच ह्याचं चळवळीतून आम्हाला मनुष्यत्व प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगून प्रेरणा भूमीच्या माध्यमातून हेच आम्ही काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रेरणाभूमी परिवर्तनाच्या चळवळीची केंद्र व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, प्रेरणा भूमितील संकल्पचित्र तसेच राष्ट्रीय पुरुषांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
त्यानंतर ममता जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरेल आवाजात स्वागत गीत म्हणून कार्यक्रमाची शानदार सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांता जाधव यांनी करून प्रेरणाभूमीची संकल्पना , राबविलेले विविध उपक्रम भविष्यातील अजेंडा याचा आढावा घेतला. तर सचिव मोहन जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय सांगून शाल, स्मृतिचिन्ह व ग्रंथ देऊन स्वागतसत्कार व सन्मान केला.
यावेळी नव्यानेच शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळावर अभिनंदनीय निवड झाल्याबद्दल कवी विठ्ठल कदम व त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या धम्मचारी पदी दीक्षा झाल्याबद्दल नवनियुक्त धम्मचारी लोकदर्शी तथा परेश जाधव यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी विठ्ठल कदम यांनी केले तर आभार शांताराम असनियेकर यांनी केले.
या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोवा राज्यातील आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.