सावंतवाडी : ज्या दीपक केसरकर यांना येथील जनतेने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा आमदार केले. त्यातील साडेसात वर्ष ते मंत्री आहेत. तरीसुद्धा ते पुन्हा संधी मागत असतील तीही विकास करण्यासाठी तर यापेक्षा दुर्दैव काय ते? आमचे आता एकच मिशन आहे केसरकरांना पेन्शन घेण्यासाठी घरी पाठवावे, येथील जनतेच्या विकासासाठी त्यांनी खूप टेन्शन घेतले आहे. आता पुन्हा एकदा मला विकासासाठी संधी द्या.!, असे ते म्हणत आहेत. नुसते म्हणत नाहीत तर त्यासाठी विविध आमिषे देखील येथील भोळ्या जनतेला दाखवत आहेत. आता त्यांनी उगीचच असे उपद्व्याप करण्यापेक्षा आराम करावा, असा मार्मिक टोला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी लगावला. सावंतवाडी येथील राजन तेली यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, मी सावंतवाडी विधानसभा प्रमुख म्हणून काम करत असताना येथील जनतेच्या सेवेसाठी संधी मिळावी म्हणून अपेक्षा ठेवली होती. अपेक्षा ठेवणे हे काही गैर नाही. मात्र आमचे पक्षप्रमुख आणि वरिष्ठ नेते जो निर्णय देतील तो शिरसावंध मानून काम करणे, हे हाडाचे शिवसैनिक म्हणून माझे कर्तव्य आहे. मात्र असे असताना चौथ्यांदा विकासासाठी संधी द्यावी, असे म्हणणाऱ्या दीपक केसरकर यांना येथील जनतेने तब्बल तीन वेळा आमदार केले आहे. असे असताना आणि मंत्रिपदाचा वापरही त्यांना येथील जनतेसाठी करता आला नाही. त्यामुळे त्यांना शेकडो वेळा संधी दिली तरी ते सावंतवाडी विधानसभेचा विकास करू शकणार नाहीत. त्यामुळे येथील जनता आता परिवर्तन नक्की करेल, असा आशावाद रुपेश राऊळ यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी राजन तेली, मायकेल डिसोजा आदी उपस्थित होते.