सावंतवाडी : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि नात्यांच्या अतूट बंधाचा सण असलेल्या रक्षाबंधनाला वेत्ये येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी निसर्गाशी नाते जोडत अनोखा सामाजिक संदेश दिला. शाळेच्या परिसरातील कल्पवृक्षाला विद्यार्थ्यांनी प्रेमाने राखी बांधून त्याच्या संरक्षणाचा संकल्प केला. या अनोख्या उपक्रमातून ‘वृक्ष वाचवा, पर्यावरण वाचवा आणि भविष्यातील पिढीचा श्वास सुरक्षित करा’ असा प्रभावी संदेश देण्यात आला.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने केवळ मानवी नात्यांनाच नव्हे, तर निसर्गाशी असलेले आपले अतूट नातेही जपले पाहिजे, हा विचार विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केला. वृक्ष आपल्याला सावली, प्राणवायू, फळे-फुले देत जीवन समृद्ध करतात. त्यामुळे या ‘निसर्गरूपी भावाला’ राखी बांधत विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असे आवाहन केले.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात रक्षाबंधनाचा उत्साह तर निर्माण झालाच; मात्र त्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही विद्यार्थ्यांच्या मनावर रुजला. संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणप्रेम यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
यावेळी वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गुरु गावकर, पालक श्रीमती कविता हरमलकर, शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव संकल्पनेचे कौतुक करून वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.
राखीच्या धाग्यातून निसर्गाशी जुळलेले हे नाते केवळ एका दिवसापुरते मर्यादित न राहता, प्रत्येकाच्या मनात वृक्षसंवर्धनाची कायमस्वरूपी भावना निर्माण करणारे ठरले.



