सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या राजकीय भूमीत भारतीय जनता पक्षाचे संघटन भक्कम असून, आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचाच विजयध्वज डौलाने फडकेल, असा ठाम विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला. विरोधकांकडे सध्या केवळ टीका करण्याचे काम उरले आहे; मात्र निवडणुकीच्या रणांगणात भाजपसमोर ते टिकू शकणार नाहीत, असा टोला लगावत त्यांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचा कानमंत्र दिला.
सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, वरिष्ठ नेते आ. योगेश सागर, आ . प्रमोद जठार, आ. निरंजन डावखरे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अलीकडे झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा संदर्भ देताना ना. राणे म्हणाले की, मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून असलेल्या अपेक्षा तसेच समाजात कोणता संदेश घेऊन जायचे, याची स्पष्ट दिशा दिली आहे. या विचारांचा अंगीकार करून प्रत्येक कार्यकर्त्याने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संघटनाच्या ताकदीवर पुन्हा इतिहास घडविण्याचा निर्धार!
सिंधुदुर्गच्या राजकीय इतिहासात भाजपच्या संघटनात्मक ताकदीमुळेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वाधिक जागा बिनविरोध निवडून आणण्याचा पराक्रम शक्य झाला. आगामी जिल्हा बँक, ग्रामपंचायत तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही समन्वय, संवाद आणि परस्पर विश्वासाच्या बळावर प्रत्येक सहकाऱ्याला ताकद देण्यात येईल, असे ना. राणे यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम करणे, अंतर्गत मतभेदांमुळे पक्षाचे नुकसान होणे किंवा पक्षचिन्हाशी प्रतारणा करणे या बाबी कोणत्याही परिस्थितीत टाळल्या पाहिजेत. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराशी आणि पक्षचिन्हाशी प्रामाणिक राहून काम केले, तर सिंधुदुर्गमध्ये भाजपसमोर एकही राजकीय पक्ष आव्हान उभे करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘सेवा पंधरवडा’ तळागाळापर्यंत पोहोचवा!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्यातील प्रत्येक उपक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश ना. राणे यांनी दिले. ‘मन की बात’सारखे संघटनात्मक उपक्रम तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना घराघरांत पोहोचविणे ही कार्यकर्त्यांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ची भक्कम पायाभरणी करत आहे. शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहनपर अनुदान, मच्छीमारांसाठीच्या विविध योजना, पर्यटन विकास आणि रोजगाराच्या नव्या संधी यांची माहिती जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिरोडा येथे येणारे नवीन पंचतारांकित हॉटेल, तळवणे येथे सुरू झालेला जहाज बांधणी प्रकल्प तसेच जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांमुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत. त्यामुळे रोजगारासाठी परराज्यात गेलेला कोकणी तरुण पुन्हा आपल्या मातीत परतण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, हा विकासाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे ना. राणे यांनी नमूद केले.
अधिकार जनसेवेसाठी, निधी संघटन बळकटीसाठी!
माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे संपूर्ण वरिष्ठ नेतृत्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे पक्षाकडून मिळालेल्या अधिकारांचा तसेच डीपीडीसीच्या निधीचा वापर केवळ जनसेवा आणि संघटन विस्तारासाठीच झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रत्येक कार्यकर्त्याने हिंदुत्ववादी विचारांशी तसेच पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक राहून काम करावे आणि सिंधुदुर्ग भाजपला राज्यातील पहिल्या तीन क्रमांकांमध्ये कायम राखण्याचा संकल्प करावा, असे आवाहन ना. राणे यांनी केले.
अवैध धंद्यांवर ‘रेड अलर्ट’, पक्षाचे नाव वापरणाऱ्यांना सज्जड इशारा!
दरम्यान, पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणात अवैध धंदे आणि ‘नशामुक्त सिंधुदुर्ग’ या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली.
सावंतवाडी व परिसरात सुरू असलेले मटका, जुगार, अवैध दारू तसेच ड्रग्जसारखे बेकायदेशीर धंदे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. पक्षाचे नाव, पद किंवा राजकीय प्रभावाचा वापर करून कोणी अशा गैरप्रकारांमध्ये सहभागी होत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
‘पक्ष मोठा आहे, व्यक्ती नव्हे; पक्षाच्या प्रतिमेला गालबोट लावणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही,’ असा स्पष्ट संदेश देत ना. राणे यांनी कार्यकर्त्यांना स्वच्छ राजकारण, सामाजिक बांधिलकी आणि नशामुक्त सिंधुदुर्गासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
एकीकडे विकासाचा झंझावात आणि दुसरीकडे संघटनशक्तीची पोलादी भिंत उभी करत आगामी निवडणुकांसाठी सिंधुदुर्ग भाजपने रणशिंग फुंकले असून, विजयासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असा निर्धार या बैठकीतून व्यक्त झाला.



