नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी घेतल्या आहेत. आता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार का? या चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि रणनीतीबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची देखील घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या –
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की,महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुतीचा पराभव करणे हाच प्रमुख उद्देश आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय कधीही घेता येईल. मुख्यमंत्री असताना मी चांगले काम केले असेन तर महाविकास आघाडीतील माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसंदर्भात निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटीनंतर तेच महाविकास आघाडीचा चेहरा असणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.