Wednesday, May 21, 2025

Buy now

spot_img

लाडकी बहीण योजनेसाठी दोन दिवसांत १ कोटी ५ लाख अर्ज ; नारी शक्ती ॲपला तुफान प्रतिसाद.

मुंबई : राज्य शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या नारीशक्ती ऍपला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर आजवर या ऍपद्वारे राज्यभरातून 1 कोटी 41 लाख महिलांनी आपले अर्ज दाखल केले असून त्यातील 1 कोटी 5 लाख महिलांचे अर्ज अवघ्या दोन दिवसात मंजूर करण्यात आले आहेत.

देशभरात कोणत्याही योजनेची अंमलबजावणी थेट डिजिटल ऍप्लिकेशन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष आणि महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून हे डिजिटल ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 12 जानेवारी रोजी अटल सेतूच्या उद्घाटनासाठी आले होते तेव्हाच त्यांनी महिला योजनांची माहिती देणाऱ्या नारीशक्ती ऍपचेही उद्घाटन केले होते. राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून याच ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज स्वीकृती करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला अनेक लोकांनी एकाच वेळी लॉग इन केल्याने यात काही अडचणी आल्या मात्र सर्व्हरची क्षमता वाढवून त्या तत्काळ दूर करण्यात आल्या. आजवर या डिजिटल ऍपच्या माध्यमातून 1 कोटी 41 लाख महिलांनी आपले अर्ज ऑनलाइन दाखल केले असून ही संख्या दिवसागणिक वाढत आहे. दुसरीकडे आलेल्या या अर्जाची अवघ्या दोन दिवसात पडताळणी करून त्यांची स्वीकृती करणं शासनाला शक्य झाले आहे. विशेष म्हणजे या पडताळणीअंती 8 लाख 27 हजार 93 अर्जाची अद्याप पडताळणी करणे बाकी आहे, तर 10 हजार 828 अर्ज हे नाकारण्यात आले आहेत. असे असले तरीही हे नाकारण्यात आलेले अर्ज पुन्हा नव्याने भरण्याची मुभा अर्जदार महिलांना देण्यात आली आहे.

बोगस अर्ज येण्याची शक्यता नाही –

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरताना आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आदी गोष्टी भरण्यात येत असल्या तरीही त्यासोबत ज्या मोबाईल नंबर वरून अर्ज भरण्यात येतो त्यावर एकदा अर्ज भरताना आणि एकदा अर्ज भरून झाल्यावर असा दोनदा ओटीपी नंबर येतो. त्यासाठी प्रत्येक महिलेने अर्ज जरी दुसर्याकडून भरून घेतला अथवा सेतू कार्यालयातून भरून घेतला तरीही ओटीपीसाठी मात्र स्वतःचा मोबाईल नंबर द्यावा लागतो. ज्यांच्याकडे मोबाईल क्रमांक नसेल त्याना कुटूंबातील एकाचा नंबर देता येतो.  त्यामुळे बोगस अर्ज भरता येणे जवळपास अशक्य आहे.

महिलांच्या वेळेची आणि पैशांची मोठी बचत –

लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नारीशक्ती ऍप आणि प्रत्यक्ष अर्ज भरून देण्याची पद्धत अवलंबली जात असली नंतर या ऍप्लिकेशनद्वारेच अर्ज स्वीकारण्यात येतात. त्यामुळे सेतू कार्यालयातून अर्ज भरले तरीही ते नंतर ऑनलाइन पाठवावे लागतात. त्यामुळे एखादी योजना यशस्वी करण्यासाठी पहिल्या दिवसापासून डिजिटल ऍप्लिकेशनचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऍप्लिकेशन द्वारे अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सोपी आणि सुटसुटीत करण्यात आली आहे. ही योजनेची अंमलबजावणी डिजिटल ऍप्लिकेशनद्वारे केल्यामुळे एरवी नेहमीच्या पध्दतीनुसार केली असती तर पाच पानांचा अर्ज भरून घेण्यासाठी 6 कोटी 85 लाख पाने लागली असती, एका झाडाद्वारे अंदाजे 10 ते 20 हजार कागदी पाने तयार होतात त्यामुळे डिजिटल अंमलबजावणीमुळे अंदाजे 4 हजार 567 झाडे वाचली आहेत. तसेच हा कागद निर्मितीसाठी होणारा पाण्याचा वापर पाहता 68.5 करोड लिटर पाण्याचीही बचत झाली तर कागद निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचा वापर पाहता त्यातही मोठी बचत झाली आहे. तसेच प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावे लागले असते तर ज्यासाठी या महिलांना करोडो रुपये खर्च करावा लागला असता मात्र डिजिटल ऍप्लिकेशनचा वापर केल्यामुळे त्यांचे शारीरिक श्रम आणि खर्चालाही कात्री लागली आहे. तसेच आलेल्या अर्जाची कमी वेळात छाननी करणे शक्य झाले आहे. त्यामुळे नारीशक्ती ऍप्लिकेशनद्वारे अर्ज स्वीकारल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या वेगवान अंमलबजावणीला मोठे बळ मिळाले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles