सावंतवाडी : आजगाव येथे जेएसडब्ल्यू मायनिंग सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये सुसंवाद घडून आला होता. संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी कोणताही अनुचित प्रकार न करता पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तसेच संबंधित व्यक्तींनीही आपल्याला कोणतीही मारहाण अथवा त्रास झालेला नसल्याचा जबाब दिला होता. मात्र, त्यानंतर सावंतवाडी पोलिस ठाण्यात ग्रामस्थांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
या कारवाईचा शिवसेनेने तीव्र शब्दांत निषेध नोंदवत ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत बोलताना शिवसेना नेते संजू परब यांनी सांगितले की, “आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांनी आपल्या हक्कांसाठी आणि परिसराच्या हितासाठी आवाज उठविला आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे अन्यायकारक असून शिवसेना ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”

यावेळी संजू परब यांनी पुढे सांगितले की, यासंदर्भात त्यांची पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनीही ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेव्हिअर फर्नांडिस, युवासेना तालुकाप्रमुख क्लॅट्स फर्नांडिस, ॲड. स्वप्नील प्रभू आजगावकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, राजेश आजगावकर, प्रशांत काकतकर, अमित प्रभू, सचिन प्रभू, आबा चीपकर, नील प्रभूझांट्ये, संघर्ष समितीचे अध्यक्ष श्री. नातू यांच्यासह आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


