सावंतवाडी : आजगाव येथे ग्रामसभेच्या ठरावाला डावलून करण्यात आलेल्या ड्रोन सर्वेक्षण प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रशासन, राजघराणे आणि संबंधित यंत्रणांवर जोरदार टीका केली आहे. ग्रामसभेच्या स्पष्ट विरोधानंतरही सर्वेक्षण करण्यात आले, मात्र त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कोणतीही कारवाई अथवा अटक का करण्यात आली नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी नगराध्यक्षांबाबत मायकल डिसोजा यांनी केलेल्या आरोपांचीही गंभीर दखल घेतली. या आरोपांमुळे सावंतवाडी संस्थानच्या नावाला धक्का पोहोचत असून संबंधितांनी जबाबदारीचे भान राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. राजघराण्यानेही या घडामोडींकडे गांभीर्याने पाहून सार्वजनिक प्रतिमेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी, असा इशाराही त्यांनी दिला.
आजगाव परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामसभेत ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शविणारा ठराव मंजूर केला होता. असे असतानाही संबंधितांकडून सर्वेक्षणाचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ग्रामसभेच्या निर्णयाचा अवमान करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करत डॉ. परुळेकर यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. आजगाव ड्रोन सर्वेक्षण प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर नव्याने चर्चा सुरू झाली असून या विषयावर राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत.


