सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘सेवा अभियान’ाला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सावंतवाडीतील काझी शहाबुद्दीन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या निवेदन स्वीकृती अभियानात नागरिकांनी विविध विकासकामे, मूलभूत सुविधा, प्रशासकीय अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांची निवेदने सादर केली.
या अभियानांतर्गत भाजप राज्य युवा नेते विशाल परब यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांची निवेदने स्वीकारत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत संबंधित विषय वरिष्ठ पातळीवर मांडून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजप कोकण विभागाचे संयोजक तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते आ. प्रमोद जठार आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संतोष साखरे यांनीही या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, मायकेल डिसोझा, नितीन राऊळ यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, प्रशासकीय कामे, विकासकामे तसेच स्थानिक पातळीवरील अन्य प्रलंबित प्रश्नांची निवेदने सादर केली. त्यामुळे ‘सेवा अभियान’ हे केवळ निवेदने स्वीकारण्यापुरते मर्यादित न राहता जनतेच्या प्रश्नांना शासनदरबारी न्याय मिळवून देण्यासाठीचे प्रभावी व्यासपीठ ठरल्याचे चित्र सावंतवाडीत पाहायला मिळाले.
जनतेच्या समस्या ऐकून घेणे, त्या वरिष्ठ पातळीवर पोहोचविणे आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. विशाल परब यांच्या पुढाकारामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून अभियानाला प्रतिसाद दिला.



