मुंबई : राज्यातील सुमारे ८० हजार जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका शाळांसह खासगी अनुदानित प्राथमिक शाळा आणि १७ हजार माध्यमिक शाळांची संचमान्यता आता अंतिम झाली आहे.
१५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण विभागाने संचमान्यतेचा नवा शासन निर्णय काढला. त्यातील पटसंख्येच्या निकषांनुसार माध्यमिक शाळांमधील सुमारे पाच हजार तर प्राथमिक शाळांमधील सहा हजार शिक्षक अतिरिक्त होतील, असे सूत्रांनी सांगितले.
संचमान्यतेचे नवे निकष ठरवून शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी आदेश काढले. या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी झाली आणि शासनाचा तो निर्णय न्यायालयातही ग्राह्य ठरला. शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्याने २०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार कार्यवाही होऊ शकली नव्हती. आता २०२४-२५ व २०२५-२६ या दोन्ही वर्षांची संचमान्यता नव्या शासन निर्णयानुसार झाली. त्यानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होणार आहे.
शासन निर्णयातील ठळक बाबी…
- पहिली ते पाचवीच्या वर्गांसाठी २० ते ६० पटसंख्येला दोन पदे मंजूर.
- तिसऱ्या पदासाठी किमान पटसंख्या ७६ बंधनकारक, १०६ पटाशिवाय चौथ्या पदाला मंजुरी नाही
- २१० पटावर प्रति ३० विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाच्या एका पदास मंजुरी
- सहावी ते आठवीसाठी १० ते ३५ विद्यार्थ्यांसाठी एक तर ३६ ते ७० पट संख्येसाठी दोन पदे मंजूर.
- नववी ते दहावीच्या वर्गासाठी २० ते ३० पटासाठी एक पद, त्यापेक्षा कमी पटाचे वर्ग बंद.
संचमान्यता अंतिम केली जात आहे
माध्यमिक शाळांची संचमान्यता आता अंतिम केली जात आहे. जे शिक्षक अतिरिक्त झाले आहेत, त्यांच्या समायोजनाची कार्यवाही १३ फेब्रुवारीपासून करावी, असा आदेश काढला आहे. तरीपण, दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा झाल्यावर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरू होईल.
नवी शिक्षक भरती १५ जूनपूर्वी…
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये सद्य:स्थितीत शिक्षकांची १८ हजारांवर पदे रिक्त आहेत. नवीन शिक्षक भरतीपूर्वी सध्या कार्यरत असलेल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. शालेय शिक्षण विभागाच्या नियोजित वेळापत्रकानुसार १५ जूनपूर्वी नवीन शिक्षक भरती होणार आहे. पण, संचमान्यतेच्या नव्या निकषांमुळे अतिरिक्तचे प्रमाण वाढल्याने नवीन भरतीत सात ते आठ हजार शिक्षक भरले जातील, असा अंदाज आहे



