सावंतवाडी : तालुक्यातील निसर्गरम्य आंबोली घाट आज एका हृदयद्रावक घटनेने काळवंडून गेला. फरशांची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत अवघ्या दहा वर्षांच्या निष्पाप चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव असून, तिची आई चैताली राऊत गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे.
आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटातील धोकादायक ‘यू’ आकाराच्या वळणावर हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. एका क्षणात सर्व काही संपले… आईच्या कुशीत वाढणारे लेकरू तिच्याच डोळ्यासमोर कायमचे निघून गेले… हा प्रसंग पाहून उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.
अपघातानंतर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नियतीने त्यालाही थांबवले—घाटातच ट्रक पलटी झाला आणि तब्बल अडीच तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आक्रमक भूमिका घेतली. “चालक आमच्या ताब्यात द्या!” अशी जोरदार मागणी करत त्यांनी संताप व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण बनताच पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधितांना ताब्यात घेतले.
या दुर्दैवी घटनेने आंबोलीसह संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. एका निरागस जीवाचा असा अचानक झालेला अंत प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेला आहे. निकिताच्या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत असून, तिच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराने सर्वांचेच मन हेलावून गेले आहे.
“देवाने इतक्या लवकर का नेले हे लेकरू?” हा प्रश्न आता प्रत्येकाच्या ओठांवर आहे.



