कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्या पिढीला घडविण्याची जबाबदारी आमदार निलेश राणे व मंत्री नितेश राणे यांनी स्वीकारली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग हा आर्थिक उत्पन्नात पहिल्या क्रमांकावर यावा, दरडोई उत्पन्न वाढावे आणि आर्थिक समृद्धी साध्य व्हावी यासाठी एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उद्योजक बनून योगदान द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री, खासदार व एसएसपीएमचे संस्थापक नारायण राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या (एसएसपीएम) इंजिनिअरिंग कॉलेजच्या ‘उत्तुंग 2026’ स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार श्री. राणे म्हणाले, मुख्यमंत्री असताना एका बैठकीत सिंधुदुर्गातील एकही इंजिनिअर उपस्थित नसल्याचे लक्षात आले. तेव्हाच या जिल्ह्यात इंजिनिअर घडविण्यासाठी कॉलेज स्थापन करण्याचा संकल्प केला. “माझा जन्म या जिल्ह्यात झाला, याच ठिकाणी राजकीय व सामाजिक यश मिळाले. हे सर्व जनतेच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले,” असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. नीलम राणे, उपाध्यक्ष नितेश राणे, संचालक डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले तसेच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
आई-वडिलांचे कष्ट व गुरुजनांचे मार्गदर्शन महत्त्वाचे : निलेश राणे
आमदार निलेश राणे म्हणाले, “संस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी आई-वडिलांचे कष्ट, चिकाटी आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. येथे सक्षम प्राध्यापकांची टीम असून मोठ्या विद्यापीठांमध्ये राबविले जाणारे अनेक उपक्रम आपल्या संस्थेतही राबविले जात आहेत,” असे सांगून त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले.
‘AI’ मुळे इंजिनिअरिंग सर्व क्षेत्रांत –
संचालक डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सांगितले की, सध्या सुमारे ७२ टक्के क्षेत्रावर इंजिनिअरिंगचा प्रभाव आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीमुळे सर्वच क्षेत्रांत मोठा बदल होत असून आरोग्य क्षेत्रातही त्याचा उपयोग वाढत आहे. हा बदल घडविण्यामागे इंजिनिअर्सचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.



