-✍️ साबाजी परब.
सावंतवाडी : एप्रिलच्या कडक उन्हात हैराण झालेल्या नागरिकांना गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने अचानक दिलासा दिला. दिवसभर उकाड्याने त्रस्त असलेल्या वातावरणात रात्री ढग दाटून आले आणि काही भागांत जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची नोंद झाली.
या अनपेक्षित पावसामुळे उष्णतेत काही प्रमाणात घट झाली असली तरी शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः आंबा, काजू व इतर हंगामी पिकांवर या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्यासह आलेल्या सरींमुळे झाडांची पडझडही झाली असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, पावसासोबतच विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने घरगुती कामे, व्यावसायिक व्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



