सावंतवाडी : तालुक्यातील नाणोस ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना पक्षाने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार रवींद्र भाऊराव जोशी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर ५८ मतांची आघाडी घेत विजय मिळवला. स्थानिक पातळीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्याने या निकालाकडे विशेष लक्ष लागले होते.
या विजयामुळे नानोस गावातील राजकीय समीकरणांमध्ये शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेषतः पोटनिवडणूक असल्याने मतदारांनी दिलेला हा कौल हा केवळ उमेदवाराच्या वैयक्तिक कार्याचा नव्हे, तर पक्षाच्या स्थानिक संघटनशक्तीचा आणि जनाधाराचा दाखला मानला जात आहे.
या विजयानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी रवींद्र जोशी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांनी या निकालामागे कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि मतदारांचा विश्वास हेच खरे बळ असल्याचे नमूद केले.
यावेळी संजय जोशी, रघुनाथ जोशी, ज्ञानदेव जोशी, अनिश जोशी यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झालेला हा विजय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणासाठीही दिशादर्शक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



