सावंतवाडी : सातुळी तिठा येथे आज (दि. ६) सायंकाळी सुमारे ४.३० वाजण्याच्या सुमारास गुरांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई करत सावंतवाडी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तीन गायी, एक वासरू आणि तीन बैल असे एकूण सात प्राणी जप्त करण्यात आले असून संबंधित वाहनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.
याप्रकरणी नागराज रामन्ना जैन (वय ४२), रामचंद्र नारायण सिद्धी (वय ४३, दोघेही रा. यल्लापूर, जि. उत्तर कन्नड, कर्नाटक), अजित नारायण धवन (वय ३७, रा. नावेली चौकेकरवाडी, ता. सावंतवाडी) आणि प्रकाश बाळा कोरगावकर (वय ७१, रा. माळगाव, कुंभार्ली रस्तावाडी, ता. सावंतवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे छोटा दोस्त (क्र. KA-31-A-3106) आणि टाटा एेस कंपनीचा टेम्पो (क्र. MH-09-CA-7816) या वाहनांतून राजापूर येथून कर्नाटकच्या दिशेने गुरांची वाहतूक करत होते. वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून दोन्ही वाहने जप्त केली.
जप्त करण्यात आलेल्या सर्व गायी, बैल आणि वासरू यांना सुरक्षितपणे गोशाळेत ठेवण्यात आले आहे. याबाबत ट्रॅफिक पोलिस जमादार श्री. आंबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष गलोले करीत आहेत.


