पंढरपूर : सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी विठूरायाच्या साक्षीने पंढरपूरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. एका आंदोलनकर्त्याला चक्कर आल्याने आणि अस्वस्थ वाटल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोहित पवार यांच्या रक्तातील साखर कमी झाली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना रोहित पवार यांनी मोठे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे आंदोलन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. कृषिमंत्री यांच्याकडून मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हे आंदोलन गेले आहे. मंत्री दत्तामामा भरणे यांनी चर्चा केल्या आहेत. मुख्यमंत्री तहसीलदारांना सांगूनही संपर्क साधू शकतात. पण ते बोलत नाहीत, असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा. संपूर्ण कर्जमाफी करावी. कर्जमाफीतील सर्व जाचक अटी मागे घ्याव्यात असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
कोण कोण आंदोलनस्थळी?
आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनावर भाजपच्या गोटातून तीव्र टीका होत आहे. आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन यांच्यासह ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी रोहित पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज जरांगे पाटील , संजय राऊत , राजू शेट्टी , हर्षवर्धन सपकाळ , शशिकांत शिंदे यांच्यासह काही दिल्लीतील नेते हजेरी लावणार आहेत. ”रक्तातील साखर कमी झाली. पण मी सहन करतोय”, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले आहे.


