सावंतवाडीवर ‘इको सेन्सिटिव्ह झोन’चे महासंकट! ; विकासाला बेड्या घालणारी अधिसूचना रद्द करण्यासाठी नागरिकांना हरकती नोंदवण्याचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे आवाहन.

सावंतवाडी : निसर्गसंपन्न सावंतवाडीच्या विकासाच्या वाटचालीवर आता ‘इको सेन्सिटिव्ह झोन’च्या अधिसूचनेचे सावट आले असून, त्याविरोधात नगरपरिषदेसह नागरिकांनी दंड थोपटले आहेत. केंद्र शासनाकडून २७ जुलै रोजी सावंतवाडी नगरपरिषद हद्दीसाठी प्राप्त झालेल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या अधिसूचनेला शहरातून तीव्र विरोध व्यक्त होत आहे. या अधिसूचनेमुळे सावंतवाडीच्या भविष्यातील विकासाला मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे.

या अधिसूचनेविरोधात सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनानेही ठोस भूमिका घेतली आहे. १४ ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकमताने ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ला स्पष्ट विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहराच्या विकासाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय एकजूट पाहायला मिळाली आहे.

विकासाच्या पंखांना छाटण्याची भीती!

‘इको सेन्सिटिव्ह झोन’ लागू झाल्यास शहरातील नवीन बांधकामे, विकास प्रकल्प, स्थानिक व्यवसाय, उद्योग तसेच पायाभूत सुविधांच्या कामांवर कठोर निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील नागरी विकास, रोजगारनिर्मिती आणि मूलभूत सुविधांचा विस्तार यांना मोठा फटका बसू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.

आजच्या सावंतवाडीच्या विकासाला उद्याच्या पिढीची स्वप्ने जोडलेली आहेत. मात्र, या अधिसूचनेमुळे शहराच्या विकासाच्या पंखांवरच निर्बंध येण्याची भीती निर्माण झाली आहे, अशी भूमिका ॲड. निरवडेकर यांनी मांडली.

‘हरकत’ हीच नागरिकांच्या हक्काची ताकद!

नगरपरिषदेने मंजूर केलेल्या विरोध ठरावाला अधिक बळ मिळण्यासाठी आता सावंतवाडीकरांनी मोठ्या संख्येने पुढे येण्याची गरज आहे. शहरातील नागरिकांनी ‘मुख्याधिकारी, सावंतवाडी नगरपरिषद’ यांच्या नावाने किमान २ ते ३ हजार हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले.

नागरिकांच्या हरकती, नगरपरिषदेचा विरोधी ठराव तसेच संबंधित प्रशासकीय कागदपत्रे एकत्रित करून ती केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे सावंतवाडी शहराला बाधक ठरणाऱ्या या इको सेन्सिटिव्ह झोनमधून शहराला वगळण्याची अथवा अधिसूचना रद्द करण्याची मागणी अधिक ताकदीने केंद्र सरकारसमोर मांडता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सावंतवाडीच्या विकासाचा प्रश्न आता केवळ नगरपरिषदेपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो प्रत्येक नागरिकाच्या भवितव्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी सावंतवाडीकरांनी एकजुटीने हरकती नोंदवून आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles