मुंबई : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (14 जून) ‘मातोश्री’वर खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील सर्व खासदारांना मुंबईत बोलावले आहे. उद्धव ठाकरे खासदारांना कोणता कानमंत्र देणार आणि कोणती नवी जबाबदारी सोपवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, परभणीचे खासदार संजय जाधव गेल्या बैठकांना गैरहजर असल्याने ते आज हजर राहणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षांतर्गत रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट दिल्लीतल्या सर्व खासदारांना मुंबई गाठण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे राज्यात लोकसभेचे 9 खासदार आहेत. यापैकी शिवसेना ठाकरे गटाचे 7 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा वारंवार पाहायला मिळते. तसेच ठाकरेंचे काही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चांही रंगली होती. त्यामुळे आजच्या बैठकीत किती खासदार उपस्थित राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ठाकरेसेनेच्या खासदारांच्या बैठकीवर मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावलेंनी टीका केली आहे. ठाकरेंच्या डोक्यावरून आता पाणी गेलं असून त्यांच्या खासदारांचा आमच्याकडे येण्याचा विचार पक्का असल्याच गोगवलेंनी म्हटलं आहे. तर ऑपरेशन टायगर पूर्णत्वाच्या दिशेनं निघालं असल्याचं केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधवांनी म्हटलं आहे.
शिवसेना(उबाठा)चे लोकसभेचे खासदार-
- संजय देशमुख, यवतमाळ
- नागेश पाटील-आष्टीकर, हिंगोली
- संजय जाधव, परभणी
- राजाभाऊ वाजे, नाशिक
- अरविंद सावंत, दक्षिण मुंबई
- अनिल देसाई, मुंबई दक्षिण-मध्य
- संजय दीना-पाटील, मुंबई उत्तर पूर्व
- भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी
- ओमराजे निंबाळकर, धाराशीव


