ज्ञानाची परीक्षा नव्हे विकासाचा हिशेब जनतेला द्या! : गौरव मुळीक यांचा घणाघाती पलटवार. ; विषय न समजता टीका करणाऱ्या केसरकरांनी आधी एक तरी आमसभा घेऊन दाखवावी! – उपसभापती मुळीक यांचे थेट आव्हान.

सावंतवाडी : पंचायत समितीच्या मासिक सभेत उपस्थित केलेल्या ‘जलजीवन मिशन’च्या अपूर्ण कामांबाबतच्या जनहिताच्या प्रश्नाचा मूळ मुद्दाच आमदार दीपक केसरकर यांना समजला नसल्याचा घणाघाती आरोप करत उपसभापती गौरव मुळीक यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “माझे ज्ञान तपासण्याऐवजी केसरकरांनी मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेला द्यावा,” असा टोला त्यांनी लगावला.
मुळीक म्हणाले, “सभेत मी प्रशासनाला विचारलेला प्रश्न अत्यंत स्पष्ट होता. अनेक गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अद्याप अपूर्ण असताना नवीन योजना आणण्याची घाई का केली जाते, हा प्रश्न मी उपस्थित केला होता. मात्र, विषय समजून न घेता केसरकरांनी माझ्यावर टीका केली. ही बाब त्यांच्या बेफिकीरीचेच दर्शन घडवते.”
“मला ज्ञान शिकवण्याची गरज नाही. पूर्ण अभ्यास आणि माहितीच्या आधारेच मी सभागृहात प्रत्येक विषय मांडतो. म्हणूनच जनतेने माझ्यावर उपसभापतीपदाची जबाबदारी सोपवली आहे,” असे ठणकावत मुळीक यांनी केसरकरांना सुनावले.
यावेळी त्यांनी केसरकरांच्या कार्यपद्धतीवरही थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “इतकी वर्षे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी जनतेच्या प्रश्नांसाठी किती अधिकृत आमसभा घेतल्या? एक तरी आमसभा घेऊन दाखवावी. जनतेसमोर येऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत. आधी जनतेशी संवाद साधा आणि मग आमच्या अभ्यासावर भाष्य करा,” असे खुले आव्हान त्यांनी दिले.
“लोकांचे प्रश्न सुटत नाहीत, विकासकामे रखडलेली आहेत आणि त्यावर बोलणाऱ्यांवर टीका केली जाते. ही लोकशाहीसाठी योग्य बाब नाही. जनतेला उत्तर देण्याची वेळ आता आली आहे,” असा इशाराही मुळीक यांनी दिला.
“ज्ञानावर भाष्य करण्याऐवजी विकासाचा लेखाजोखा द्या; आणि हिंमत असेल तर एक तरी आमसभा घेऊन दाखवा!” अशा शब्दांत गौरव मुळीक यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर राजकीय तोफ डागली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles