रत्नागिरी : जिल्ह्यातील खेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. खेड मधील जगबुडी नदीच्या डोहात तिघेजण बुडाले आहेत. नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने तीन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे तिघेही सख्खे भाऊ आहेत. विचित्र घटनेने खेडमध्ये खळबळ उडाली आहे. खेड आणि भोस्ते गावच्या दरम्यान जगबुडी नदीच्या डोहात पोहायला गेले असताना ही दुर्घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडाल्याची माहिती मिळाली आहे. खेड पोलिस घटस्थळी रवाना झाले आहेत.
हृदयद्रावक घटनेमुळे खेड शहरासह परिसरात शोककळा पसरली –
खेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जगबुडी नदीच्या डोहात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचा बडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेड शहरातील जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघा सख्ख्या भावांचा आज दुपारी तीनच्या दरम्यान बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे खेड शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे हे तिघे सख्खे भाऊ मूळचे सांगली जिल्ह्यातील असून मुंबईतील कुर्ला येथे वास्तव्यास होते. सुट्टीसाठी ते खेड येथील नातेवाईकांकडे आले होते. बुधवारी दुपारी ते आणखी एका नातेवाईकासह जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेले होते.
एकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश, मात्र तीन जणांचा मृत्यू –
पोहत असताना नदीतील पाण्याची खोली लक्षात न आल्याने चौघेही खोल पाण्यात अडकले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. या प्रयत्नात एका युवकाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले; मात्र आकाश, नरेश आणि कैलास कांबळे यांना वाचवता आले नाही. तिघांचाही बुडून मृत्यू झाला. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तिघा भावांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.


