गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचे लक्ष्य ठेवले असून, दिवसअखेर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 34 षटकांत 4 बाद 84 धावा केल्या आहेत.
त्यामुळे श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी आता आणखी 288 धावांची गरज आहे. भारताने पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत 116.4 षटकांत 462 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव 79.4 षटकांत 284 धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 178 धावांची भक्कम आघाडी मिळाली.
भारताने दुसऱ्या डावात मात्र अपेक्षेप्रमाणे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय संघ 48.5 षटकांत 193 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे श्रीलंकेसमोर विजयासाठी 372 धावांचे आव्हान उभे राहिले.
भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबाव कायम ठेवत श्रीलंकेचे चार फलंदाज माघारी पाठवले. दिवसअखेर श्रीलंकेच्या खात्यावर 84 धावा असून, त्यांच्या हातात अद्याप सहा विकेट्स शिल्लक आहेत.
श्रीलंकेला आता सामन्याच्या पाचव्या दिवशी विजयासाठी 288 धावा कराव्या लागणार आहेत.
दुसरीकडे, भारताला विजयासाठी आणखी सहा विकेट्सची गरज आहे.
त्यामुळे गॉल कसोटीचा निकाल आता पाचव्या दिवशीच्या खेळावर अवलंबून असून, भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेचा फलंदाजीचा किल्ला भेदण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत भारत कुठे?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया 77.78 विजयी टक्केवारीसह पहिल्या, दक्षिण अफ्रिका 75 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या, न्यूझीलंड 72.22 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या आणि बांग्लादेश 66.67 विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 गुणतालिकेत भारतीय संघ 48.12 विजयी टक्केवारीसह पाचव्या, तर श्रीलंकन संघ 41.67 विजयी टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यातील निकालाचा हमखास परिणाम गुणतालिकेत दिसून येईल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी या सामन्यातील निकाल महत्त्वाचा आहे.
भारताने सामना जिंकला तर काय?
श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने जिंकला तर क्रमवारीत फार काही फरक पडणार नाही. भारतीय संघ पाचव्या स्थानावरच राहील. पण विजयी टक्केवारी कमालीची सुधारणार आहे. 48.12 टक्क्यांवरून थेट 53.55 टक्के होईल. तर श्रीलंकन संघही सहाव्या स्थानावरच राहिल, पण टक्केवारीत घसरण होईल. श्रीलंकन संघ सध्या 41.67 टक्क्यांवर आहे. त्यात घसरण होऊन 33.33 टक्के होईल.



