सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या अभियानांतर्गत सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सावंतवाडीत निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या तसेच प्रलंबित प्रश्नांची निवेदने भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या नावे सादर करता येणार आहेत. या माध्यमातून जनतेच्या समस्या थेट वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
आ. प्रमोद जठार, संतोष सावरे स्वीकारणार निवेदने –
या विशेष अभियानांतर्गत महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजप कोकण विभागाचे संयोजक तथा भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रमोद जठार आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संतोष सावरे नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत.
त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या परिसरातील विकासकामे, मूलभूत सुविधा, प्रशासकीय अडचणी आणि प्रलंबित प्रश्नांची निवेदने या अभियानाच्या माध्यमातून सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२४ ऑगस्टला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत –
हे निवेदन स्वीकृती अभियान सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समस्या आणि प्रलंबित कामांची निवेदने सादर करावीत, असे आवाहन केले आहे.



